#..असे प्रबोधन हे आजीवन तुज सम आम्हा जमो...


..असे प्रबोधन हे आजीवन तुज सम आम्हा जमो...

२०१५ पासून पोंक्षे सर निगडीत यायला लागले.
मग मा. संचालकांप्रमाणे त्यांचेही नियोजन मी करायला लागलो.
आज सहज ती वही चाळत होतो.
खूप विषय हाताळले आहेत सरांनी निगडीत.
अनेकांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या आहेत.
अनेकांचे पाठ पाहिले आहेत.
त्यावर लेखी, तोंडी प्रतिसाद दिला आहे.
मग एकदा अशीही चर्चा झाल्याची आठवतीये की पाठ पाहून प्रतिसाद देण्यापेक्षा पाठटाचणावर चर्चा करू, म्हणजे त्याचा उपयोग लगेचच अध्यापकांना पाठ घेताना होईल.
मग त्या पद्धतीने नियोजनात बदलही करण्यात आला.
अभिव्यक्ती योजना, सहाध्याय दिन, प्रकल्प पद्धती, स्नेहसंमेलन, कार्यपत्रके अशा अनेक विषयांवर निगडीतील अनेक सदस्यांना  सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी शैक्षणिक, कायदेशीर, शासकीय अशा अनेक गोष्टींवर विभाग प्रमुखांशी संवाद साधला आहे.
पालक बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर बोलले आहेत.
एकदा ७ वीच्या मुलांसाठी नाण्यांंतून समजणारा इतिहास या विषयावर एक कार्यशाळा घेतल्याचेही आठवत आहे...
निगडीत आल्यावर बऱ्याच वेळा ते माझ्याच कार्यालयात बसायचे.
मग मी त्यांच्या समोर बसायचो.
मी माझे काम करत असायचो.
येणारे अनेक जण शेजारी बसून त्यांच्याशी संवाद करायचे.
त्या चर्चा ऐकूनही माझे खूप प्रकारचे शिक्षण झाले आहे.
दृष्टीकोन व्यापक झाला आहे.
पण एक गोष्ट प्रत्येक वेळी जाणवायची.
त्यांना भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती भेट संपून जाताना दोन प्रकारच्या भावना मनात साठवून जायची.  
एक तर ती समाधानी असायची.                          
जो प्रश्न ती घेऊन आलेली असायची; त्याचे उत्तर तिला मिळालेले असायचे.
तिच्या शंकेचंं निरसन झालेलंं असायचंं आणि
काही तरी कामाची प्रेरणा त्या व्यक्तीला मिळालेली असायची.
मीही... हा अनुभव अनेकदा घेतला आहे.
...सर ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्या खुर्चीला नमस्कार करून मी तिच्यावर बसलो.
....................
सरांच्या व्यासंगाबद्दल काय बोलायचं?
एकदा सरांसोबत माध्यमिक इंग्रजी विभागाच्या संग्रहात्मक प्रकल्पांचे प्रदर्शन पाहण्याचा योग आला.
पहिलाच प्रकल्प पेन्सिलींच्या संग्रहाचा होता.
इतक्या प्रकारचे प्रश्न सरांनी त्या मुलांना विचारले...
मला आजही आठवतायेत.
पेन्सिलींवर काय काय लिहिलेलं असतं?
HB चा अर्थ काय?
केवळ H किंवा B लिहिलेल्या पेन्सिली असतात का?
त्यांच्या पुढे लिहिलेल्या क्रमांकाचे काय अर्थ होतात?
त्यानुसार पेन्सिली कोणत्या गोष्टींसाठी वापरायच्या हे ठरते का?
१०-१५ प्रश्न तरी सहज विचारले असतील सरांनी.
आणि ज्या ज्या प्रश्नांची उत्तरे त्या मुलांना देता आली नाहीत त्या प्रश्नांची उत्तरे सरांनी स्वतः दिली.
ज्या ज्या प्रकल्पाला सरांनी भेट दिली त्या त्या प्रत्येक ठिकाणी असाच संवाद झाला.
विषय कोणताही असो.
सरांना माहिती आहेच.
एकदा एका वैचारिकात मा. संचालक म्हणाले होते, ”मुलांना जितकी माहिती असणे अपेक्षित त्याच्या १००० पट अधिकची माहिती अध्यापक म्हणून आपल्याला असली पाहिजे.”
पोंक्षे सर म्हणजे याचं मूर्तिमंत उदाहरण होते.
....................
निगडीत झालेली ज्ञानवर्धन व्याख्यानमाला ही सरांचीच कल्पना होती.
त्या व्याख्यानमालेची सुरवातही सरांनीच केली.
‘परिसरातील गणित’ हा विषय सरांनी त्यांच्या व्याख्यानातून मांडला.
त्यानंतर सुमारे ५-६ व्याख्याने झाली.
त्या व्याख्यानांचे वक्ते, विषय सरांनीच सुचवलेले होते.
आणि केवळ नावं सुचवून ते थांबले नाहीत तर त्या वक्त्याशी पहिला संपर्क स्वतः करायचे.
त्याला सगळी पार्श्वभूमी समजावून सांगायचे.
आणि मग मला पुढील कामे करायला सांगायचे.
पहिल्या २ व्याख्यानानंतर ९ वीतील ३-४ मुलींचा एक गट भेटायला आला आणि म्हणाला, “दादा पुढचे व्याख्यान कधी आहे रे?”
मुलांनी व्याख्यान कधी आहे हे विचारावे हा मोठाच सुखद धक्का होता माझ्यासाठी.
पण खरचं सर्वच व्याख्याने खूपच अप्रतिम झाली.
....................
जम्मत घरात जेव्हा पझल लायब्ररीची सुरवात केली तेव्हा सरांना सांगितलं, “सर खेळण्यांसोबत puzzles चा एक छोटा उपविभाग सुरु केला आहे.”
“अरे वा. येतो एकदा बघायला.”
आणि खरंच एके दिवशी आले की.
केवळ जम्मत घर पाहायला.
अन्य कोणतही काम त्या दिवशी त्यांंचं निगडीत नव्हतं.
मीही सगळ मग उत्साहानं दाखवलं.
थांब म्हंटले.
“शुटींग पण करूयात या सगळ्याचं.”
सोबत ERC मधील एक जण होता.
त्याने छोटा व्हिडीओ केला जम्मत घरावर.
सरांनीही एक बाईट दिला.
वेबसाईटला upload केल्यावर तुला लिंक पाठवतो म्हणाले.
जाताना म्हणाले, "पुष्कळ संग्रह केला आहेस. मुलांना नक्की उपयोग होईल. पण या साधनांच्याद्वारे मुलांची काही निरीक्षणे करता येतील का? त्यांच्या नोंदी ठेवता येतील का? असा एक विचार करून बघ की जरा.”
अच्छा यासाठी आला होता तर हा बाबा...असं मला वाटून गेलं.
पण ती गोष्ट मी मनावर घेतली आणि खेळण्यांच्याद्वारे मुलांच्या नोंदी असा एक छोटा प्रकल्प सरांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात जाऊन केला.
त्यावर स्वतंत्र लेखन केलं आहे.
त्यामुळे आत्ता सविस्तर सांगत नाही.
....................
मागच्याच महिन्यात सरांना फोन केला होता.
आणि खरं तर माहित नव्हतंं की सर खूप आजारी आहेत.
आता कधीच प्रबोधिनीत येऊ शकणार नाहीत.
त्यामुळे सहज फोन केला जायचा.
सरांचाही काही वेळा यायचा.
तसाच एक फोन झाला होता.
सरांना म्हंटलंं, “सर, ९ वीत एक मुलगी आहे. गणित विषय चांगला आहे तिचा. तिला एकदा भेटायला घेऊन येतो. तिला काही मार्गदर्शन करा.”
“जरा आजारी आहे रे. घरीच आहे सध्या. आत्ता लगेच काही सुचत नाहीये. पण करतो तुला मी फोन.”
सर आजारी आहेत म्हटल्यावर मी विषय डोक्यातून काढून टाकला.
पण ४-५ दिवसांनी सरांचाच फोन आला.
“अरे त्या एका मुलीसाठी काही करण्यापेक्षा तू जरा सर्व विभागातील गणितातील चांगली मुले निवड. त्यांची एक कार्यशाळा घेऊ. मी आदित्यशी बोललोय. त्यानंतर ठरवू त्या मुलीविषयी.”
त्यानुसार ती ३ दिवसांची कार्यशाळा झाली.
सर्व विभागातील १५ एक मुले, ३ गणित अध्यापक सहभागी होते.
मस्तच झाली कार्यशाळा.
एखाद्या व्यक्तीनं एखादा विषय मांडला असेल तर तो डोक्यात ठेवणं, त्याचं शेवटचं टोक गाठणं आणि स्वतःच्या आयुष्याचं शेवटचं टोक दिसत असतानाही... सरांचं हे वागणं केवळ स्तिमित करणारं होतं.
....................
सरांचा laptop कधी कुणी बघितला असेल तर इतका खजाना होता त्या laptop मध्ये.
जगभरात शिक्षणातलं म्हणून जे काही असेल ते बहुधा सरांच्या laptop मध्ये होतं.
निगडीत आले की प्रत्येक वेळी काही तरी नवीन दाखवायचेच सर.
....................
मागच्याच महिन्यात सरांनी एक msg पाठवला.
Inspired from last year nigdi stay vkv, Arunachal.
सोबत एक फोटो होता.
छान वाटलं.
....................
मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे दिला जाणारा 'गुरुगौरव पुरस्कार' यंदाच्या वर्षी सरांना देण्यात आला. 
त्यावेळी मानपत्राचंं वाचन करण्याची संधी मी आवर्जून घेतली.



....................
एका वाक्यात सांगायचं झालं तर शिक्षणाचा म्हणून काही मनोमय कोश असेल तर तो मी भाऊंकडून शिकायचा प्रयत्न केला तर विज्ञानमय कोश मी पोंक्षे सरांकडून शिकायचा प्रयत्न केला.
....................
विनोबांनी एके ठिकाणी म्हटलंं आहे, ‘दिवसभर काम करणाऱ्या व्यक्तीला रात्रीची झोप जशी आवश्यक व आनंददायक तितकीच जन्मभर मेहनत करणाऱ्या व्यक्तीला शेवटची महानिद्रा आवश्यक व आनंददायक असते.’
फार कमी लोकांच्या नशिबी ही महानिद्रा येत असेल कारण खूप कमी लोक आयुष्यभर, शेवटच्या क्षणापर्यंत काम करत असतील.
 ....................
श्रद्धांजली वहायची म्हणजे नेमकं काय करायचं असतं?
मला एकदम आ. भाऊंनी या विषयावर दिलेली चिंतनिका आठवली.
त्या चिंतनिकेत भाऊ म्हणाले होते, “जुनं शरीर सोडून दिलेला जो जीवात्मा आहे, त्याचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी देह हवा असतो. तो देह माझा आहे असं सांगणं, आपला देह त्याच्या कामासाठी देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे श्रद्धांजली.”
खूपच व्यापक अर्थ सांगितला आहे भाऊंनी 'श्रद्धांजलीचा'.
मोठं धाडस लागेल असं काही म्हणण्यासाठी.
मग मी जरा माझ्यापुरता विचार करून बघितला.
आणि मग लक्षात आलं की, पोंक्षे सर एका वेळी अनेक गोष्टी करायचे, अनेक आघाड्या सांभाळायचे, यशस्वीपणे पूर्ण करायचे.
महेंद्रभाईंनी जो लेख सरांवर लिहिला होता; तो लेख म्हणजे सरांनी केलेल्या अनेक प्रकल्पांची ती केवळ एक यादी झाली होती. 
म्हणजे यादी करण्यातच त्या लेखाची शब्दमर्यादा संपली होती.
स्वतःबाबत विचार करताना माझ्या लक्षात आलं की मला छोट्या छोट्या नवीन गोष्टी सुचतात.
जम्मत घर, गच्ची बाग, अभ्यास सहली, चित्रकला प्रकल्प, भित्तिचित्रे कार्यशाळा, पुणे जिल्ह्यातील दुर्ग मोहीम....
पण नवीन सुचलं की आधीच्या गोष्टींवर व नित्य कामावर त्याचा परिणाम होतो.
नकळत दुर्लक्ष होतं.
त्यामुळे मी असा संकल्प करतो की माझ्यावर असलेली व हौस म्हणून मी स्वीकारलेली अशी कोणत्याही प्रकारची जबाबदारी असो ती मी अन्य कोणत्याही गोष्टींवर परिणाम न होऊ देता ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.
हा माझा संकल्प हीच माझी कै. विवेकराव पोंक्षे सर यांच्या प्रती श्रद्धांजली.

शिवराज पिंपुडे
शिक्षण समन्वयक
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र
८८८८४३१८६८ 









Comments

  1. खूप छान दादा खरी श्रद्धांजली काय असते ते ही कळाले

    ReplyDelete
  2. श्रद्धांजलीचा अर्थ आपल्या लेखातून उमगला.

    ReplyDelete
  3. अप्रतिम! तुला हॅट्स ऑफ. तुझ्या 'आम्ही चालवू हा पुढे वारसा' या संकल्पासाठी अनेकानेक शुभेच्छा!

    ReplyDelete
  4. दादा तुमच्या अनुभवाचे जाणतेपण उत्तमपणे शब्दबद्ध झालंय . अभ्रकाचे असंख्य पदर निघतात .. प्रत्येक विशेष ..तसे आ.पोंक्षेसरांबद्दल

    ReplyDelete
  5. खरीखुरी श्रद्धांजली 💐
    ठरवलेले पूर्ण करण्यासाठी तुला खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  6. "आमी बी'घडलो... तुमी' बी घडाना" हे वाचकांना सहज सांगून जाणारी, सुंदर
    शब्दांकनाने साकारलेली ही श्रध्दांजली.

    ReplyDelete
  7. संकल्परूपी श्रध्दांजली 👌👌👌अशीही श्रध्दांजली असू शकते.

    ReplyDelete
  8. त्यादिवशी बोलले शब्द, आज लिखाणात अगदी तसेच आले दादा..किती मोठ व्हायचे रोज नवे dnyan दिवे चेतवायचे

    ReplyDelete
  9. पोंक्षे सरांना जवळून जास्त अनुभवता नाही आले ही खंत आहेच... आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नाही मिळाला... पण लेखाच्या निमित्ताने आपण हे संचित आमच्याकडे पोहचविले... धन्यवाद

    ReplyDelete
  10. Shivraj memorable moments you have penned down..Even I remembered so many incidents and motivational meetings with Sir.A great personality.
    May his tribe increase and may his soul rest in peace.

    ReplyDelete
  11. I have met him in 1971,
    very graceful,
    I wanted to join PRABODHINI,
    but he said,
    Tuze "CHAIL" military school laa niwad zaalee aahe tikdech jaa,
    pan jeva PUNYALA yeshil tevaa aamchya mulana tuze anubhav sangaaylaa yet jaa
    karan drushtee 360 anshachi banawnyaa saathee he jaruree aahe.
    SALUTES TO HIM,
    AND HIS ESTABLISHMENT.

    ReplyDelete
  12. I think at place like this,
    there is no work of unknown,
    Some name,
    either Own or Pen is must to show,you are not unknown,
    but
    "FRIEND"
    of
    BLOG.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मंतरलेली रात्र...!