काही आठवणी... विखुरलेल्या, विस्कळीत.

काही आठवणी...विखुरलेल्या काहीशा विस्कळीत.

शाळेत असतानाच्या काही...
इयत्ता पाचवीसाठी खुद्द भाऊ वर्गशिक्षक होते.
इंग्रजी विषय शिकवायचे.
इंग्रजीच्या तासाला पूर्णपणे इंग्रजीतून बोलणे करायचे.
एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही तर फळ्यावर चित्र काढायचे पण मराठीतून बोलणे टाळायचे.

कुठलातरी इंग्रजीचा प्रकल्प करायला दिला होता पाचवीत.
आणि त्याचे वाढीव गुण तुम्हाला वार्षिक परीक्षेत मिळतील असं सांगितलं गेलं होतं.
गुणपत्रिका हातात पडली तेव्हा भाऊंनी स्वहस्ताक्षरात प्रत्येकाच्या गुणपत्रकार वाढीव गुण दिल्याचे दिसले.
त्यामुळे काहींचे गुण शंभरपेक्षा अधिक झाले.
पण त्याला भाऊंची हरकत नव्हती.










सायकलवरून शाळेत येत होतो.
माझ्याकडे लेडीज सायकल होती;
आईलासुद्धा वापरता यावी म्हणून.
समोरून भाऊ येत होते.
"अहो वीर तुमची सायकल द्या जरा."
असं म्हणून सायकलवर स्वार होऊन स्वारी नजरेआड देखील झाली.
सुरुवातीच्या काळात अशा कित्येक मुलांच्या सायकली घेऊन कित्येकांच्या गृहभेटी केल्या आहेत भाऊंनी.

शाळेत शिकत असताना भाऊ भेटायला बोलवायचे.
पण भीती वाटायची.
नको वाटायचे जायला.
त्यांच्या खोलीपर्यंत जायचो, खोलीबाहेरचा चपलांचा ढीग बघून परत फिरायचो.
हेच कारण बनवले मग मी.
भेटायला का नाही आला असे विचारले तर खूप लोक तुमच्याकडे होती त्यामुळे नाही आलो असं सांगायचो. 
"कितीही लोक असू दे माझ्याकडे. खोलीच दार उघडायचं. आत यायचं. मला विचारायचं की वेळ आहे का म्हणून; मग मी सांगेन आत्ता भेटायचं की नंतर. तू ठरवायचं नाही. आणि परस्पर निघून जायचं नाही."
पण नाही म्हणजे नाहीच गेलो मी फारसा भेटायला.

शालेय जीवनानंतरच्या काही...
दहावीनंतर मात्र दर रविवारी भाऊंच्या भेटी सुरू झाल्या. 
एकदम नियमित.
सुमारे पाच वर्षे.
कोणताही विषय वर्ज्य नव्हता गप्पांना.
खूप मोकळा संवाद व्हायचा.
एखाद्या दिवशी काही काम असेल किंवा शाळेमध्ये भाऊ येणार नसतील तर आदल्या दिवशी फोन करून घरी निरोप ठेवायचे, 'उद्या माझी वाट बघू नकोस. मी येणार नाहीये.'
लोक ज्यांची वेळ घेऊन भेटायला येतात ते मला फोन करून सांगतात की उद्या नाही आलास तरी चालेल.
याचं मोठे अप्रूप वाटायचं त्या वेळी.

भाऊंच्या डोक्यात अज्ञातवास नावाची एक कल्पना आली.
आणि मग निगडी केंद्रातून वर्षातून एकदा काही दिवस ते गायब होऊ लागले.
कुठे जायचे, कुठे राहायचे हे कोणालाच माहिती नसायचं.
एक वर्षी मला विचारलं, "येणार का माझ्यासोबत अज्ञातवासात?"
भाऊंना नाही असंही म्हणायचे असतं हे मला खूप उशिरा समजलं, अंगवळणी पडलं.
गेलो मग त्यांच्यासोबत अज्ञातवासात.
बसस्टॅंडवर गेल्यावर 'कुठल्या गावाच्या गाडीत बसायचं रे;' असं विचारायचे आणि मग कुठली तरी एक गाडी आम्ही पकडायचो.
तिथे गेल्यावर भाऊ त्यांच्या संपर्कातील अनेक व्यक्तींपैकी एकाच्या घरी जाऊन धडकायचे.
भाऊ असे अचानक आल्याचे पाहून कोण आनंद व्हायचा घरातील सगळ्यांना.
जोरदार स्वागत व्हायचं.
उत्तम सरबराई व्हायची.
माझ्याकडे बोट दाखवून भाऊ म्हणायचे,' हे आमचे खाणारे तोंड सोबत आहे. यांना आग्रह करा.'
फारच बरं वाटायचं अशावेळी.

खूपदा भाऊंचं घरी येणं झालं.
कधी सहज भेटायला, कधी कुठल्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं तर कधी जेवायला म्हणून.

माझं लग्न झाल्यावर भाऊंनी आणि माईंनी आम्हा उभयतांना जेवायला बोलावलं.
आमरस व पुरणपोळी हे दोन पदार्थ एकत्र खाता येतात आणि फारच भन्नाट चव लागते त्यांची हे प्रथमच अनुभवलं त्यादिवशी.

एकेक व्यक्ती जोडण्यासाठी व्यक्तिगत संवाद लागतो, 
कामापलिकडे त्या व्यक्तीच्या आयुष्यात डोकवावं लागतं,
नातं निर्माण करावं लागतं आणि 
यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो.
आणि हो हे सगळे सहज घडावं लागतं...

केवळ अवलिया...
संध्याकाळची वेळ होती.
माझी कामे आटपून घरी निघालो होतो.
भाऊ सुद्धा घरी निघाले होते.
मधल्या चौकात भेट झाली.
उभ्यानेच गप्पा झाल्या.
इतक्यात समोरून तीन-चार जण हातात मोठ्या बॅगा घेऊन येताना दिसले.
संस्थेने मुख्याध्यापक प्रशिक्षण वर्ग योजला होता.
पण पुरेशी नोंदणी न झाल्यामुळे रद्द केला होता.
हे तिघे चौघे थेट त्या वर्गासाठी म्हणून आले होते.
भाऊंनी त्यांना वर्ग रद्द झाल्याचे कळवलं.
त्यांची जेवणाची, एका रात्रीची राहण्याची व्यवस्था केली आणि निघाले.
थोडे पुढे गेल्यावर थांबले.
मागे वळून त्यांना परत बोलावलं.
"मग तुम्ही तुमच्या संस्थेत जाऊन काय सांगणार?"
"काही नाही. वर्गासाठी गेलो होतो. रद्द झाल्याचे समजले."
"नाही; असं नाही सांगायचं. वर्गासाठी गेलो होतो आणि पूर्वकल्पना दिल्याशिवाय, नोंदणी केल्याशिवाय कोणत्याही वर्गाला जायचं नाही असं शिकून परत आलो आहोत; असं सांगायचं सगळ्यांना."
चौघांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.

आदरणीय संचालकांचे वैचारिक सुरू होते.
त्यात त्यांनी एक प्रश्न विचारला.
प्रबोधिनीला एखाद्या पक्ष्याची उपमा द्यायची झाली तर कोणत्या पक्ष्याची द्याल?
लोकांनी गरुड, मोर...उत्तरे देण्यास सुरुवात केली.
भाऊंनी हात वर केला.
संचालकांनी त्यांच्याकडे बघितलं.
भाऊ म्हणाले, "पोपट. पोपटाची उपमा देईन मी.'
मध्ये एखादा क्षण गेला असेल;
आणि गिरीशराव म्हणाले, "पंचरंगी पोपट म्हणावे लागेल तुम्हाला."
त्या भर बैठकीत गडगडाटी हसल्याचो आजही आठवतय.

एकदा भाऊंनी कार्यालयात बोलावून घेतलं.
तुझ्याकडे काम काढले आहे म्हणाले.
"बोला भाऊ."
"एक सदगृहस्थ आहेत. उत्तम पद्धतीने जीवन प्रवास झाला आहे त्यांचा. आणि आता त्यांना तो पुरा करायचा आहे. तर गंगा नदीत ते देह अर्पण करतील. तू त्यांची केवळ सोबत करशील का?"
"सांगा कधी आणि कसं जायचं आहे."
नंतर त्या सदगृहस्थांचा बेत रहित झाल्याचं समजलं.

दुर्ग जागर मोहीम अंतिम टप्प्यात आली होती.
भाऊंना निवेदन करत होतो.
अचानक भाऊंनी प्रश्न विचारला, "अजून तुम्ही जात आहात का मोहिमेला?"
मला अर्थ लागायला थोडा वेळ लागला.
मग समजलं की मोहिमेचे नेतृत्व अजून तुमच्याकडेच आहे का; मुलांकडे सोपवलं नाही का? असं त्यांना म्हणायचं होतं.
शेवटच्या टप्प्यातील ट्रेक्सची जबाबदारी मुलांचे गट करून सोपवून दिली.
फारच उत्तम प्रकारे निभावली मुलांनी.
आणि प्रत्येक प्रत्येक ट्रेकमध्ये वेगळं काही घडेल असंही पाहिलं मुलांनी.
एखादीच सूचना किंवा प्रश्न विचारायचे भाऊ पण विचारांची, कामाची दिशाच बदलून जायची.

भाऊंच्या एका पुस्तकाचं संपादन केलं होतं.
पुस्तक छापून हातात आलं  होतं.
आनंदानं दाखवायला घेऊन गेलो.
पुस्तकाच्या नावातच एक व्याकरणदृष्ट्या चूक राहिली होती.
सहज लक्षात येत नव्हती.
पण ती चूकच होती.
फारच अस्वस्थ झालो मी.

भाऊ शांतच होते.                                                                  
म्हणाले, "अरे काल भागवत ऐकायला नव्हतास का? काही झालं तरी आत्मा अस्वस्थ होऊ द्यायचा नसतो, असं सांगितलं काल प्रवचनकारानी. करू पुढील आवृत्ती सुधारणा." काय बोलणार होतो मी यावर.


श्रद्धांजली सभेत सौ. उषाताई पिंपुडे (मातोश्री) बोलत होत्या, "भाऊ शब्द उलटा वाचला तर ऊ(उ)भा होतो. माणसाला उभा करतो, अडचणीच्या वेळी पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तो भाऊ.
या एका वाक्यात भाऊंच्या साऱ्या व्यक्तित्वाचं सार आलं आहे असं वाटून गेलं...


आज इतक्यावर आटोपतं घेतो.
परत कधी तरी, कुठल्या तरी निमित्तानं भेटू...
आज भाऊंच्या जन्मदिनानिमित्त आमच्या चित्रकला प्रकल्पातील आर्या व साहिलला भाऊंचे फोटो पाठवले व चित्र काढायला सांगितले.                    
चांगला प्रयत्न केला दोघांनी.                                                          
शेखर पवार सरांनी मार्गदर्शन केलं.                                                  
साहिलचे चित्र आपल्यापर्यंत पोहोचलं आहेच.                                    
आर्याने काढलेले हे रेखाचित्र.



Comments

  1. अप्रतिम दादा... जिवंत अनुभवांनी आम्हाला सुद्धा त्या काळात नेलस तू👍👌

    ReplyDelete
  2. दादा , भाऊंच्या आठवणींचे खूप सुंदर लेखन .

    ReplyDelete
  3. खूप छान लेखन, आ. भाऊ यांच्या स्वभावाचे आठवणीतील अनेक पैलू यावर आपण ओघवत्या शैलीत मांडले. खूप छान शिवराज दादा.

    ReplyDelete
  4. दादा नेहमीप्रमाणेच सुंदर शब्दांकन
    तुमचे बालपण, त्यावेळचे सायकल चालवणारे भाऊ, अचानक गृह भेट सर्व प्रसंग डोळ्यासमोर येतात इतके सुंदर वर्णन.

    ReplyDelete
  5. भाऊंच्या अनेक व्यक्तिमत्वाचे पैलू खूप छान उलगडले.

    ReplyDelete
  6. पूर्वा देशमुख
    सगळे शब्दातीत प्रसंग वाचताना डोळ्यासमोर घडताहेत असे वाटले.गुणपत्रक पाहून विशेष आनंद झाला.एकदम भिडणारं लेखन

    ReplyDelete
  7. परत भाऊ भेटले लेखातून

    ReplyDelete
  8. मस्त व्यक्त झाला आहेस ... तुझ्या नेहमीच्या शैलीत ... भाऊंसारखं व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ परीस ... अवघ्या आयुष्याचे सोने करणारं 🙏

    ReplyDelete
  9. छान दादा...नेहमी प्रमाणे खूपच सुंदर

    ReplyDelete
  10. अप्रतिम शब्दांकन! आ. भाऊ डोळ्यासमोर उभे राहिले.👍🙏🙏

    ReplyDelete
  11. दादा, छान शब्दांकन !

    ReplyDelete
  12. फारच भारी यार..... माझे पाचवी पासूनचे प्रसंग आठवले

    ReplyDelete
  13. खूप सुंदर शब्दांकन दादा..!!👍🙏

    ReplyDelete
  14. आदरणीय भाऊ डोळ्यासमोर उभे राहिले!🙏🙏

    ReplyDelete
  15. भावस्पर्शी, थेट आ.भाऊंची भेट शब्दांतून घडवणारे.

    ReplyDelete
  16. खूपच छान ! 1 -1 प्रसंग , शाळेतील आठवणी डोळ्यासमोर उभ्या रहात होत्या , अचानक डोळ्यांच्या कडा कधी ओल्या झाल्या हे समजलं नाही..
    पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा !! 👍

    ReplyDelete
  17. खूपच छान वाटले दादा वाचून 😊मी न पाहिलेले , अनुभवलेले भाऊ डोळ्यासमोर उभे राहिले तुमच्या लिखाणातून 🙏🙏आर्याने भाऊंचे चित्र अप्रतिमच काढले आहे . तिचे कौतुक 🌺🌺

    ReplyDelete
  18. खूपच छान वाटले दादा वाचून 😊मी न पाहिलेले , अनुभवलेले भाऊ डोळ्यासमोर उभे राहिले तुमच्या लिखाणातून 🙏🙏आर्याने भाऊंचे चित्र अप्रतिमच काढले आहे . तिचे कौतुक 🌺🌺

    ReplyDelete
  19. शिवराज
    वाचताना तूआणि भाऊ समोर उभे राहिले जणु प्रसंग आता घडतोय, प्रेमाच्या नात्यातला संवाद! मनाला भिडणारा! मस्तच!

    ReplyDelete
  20. संवादात्मक शैलीमुळे वर्णन जीवंत झालं आहे. डोळ्यासमोर प्रसंग आणि त्यातीभाऊ उभे राहिले सुंदर मांडणी व उजाळा.

    ReplyDelete
  21. शिवराज दादा, खूप छान लेखन केलं आहे साक्षात भाऊ डोळ्यासमोर उभे राहिले आणि डोळ्यासमोर प्रसंग अवतरला. पुन्हा एकदा भाऊंच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! असेच लेखन आम्हाला वाचायला मिळेल आणि भऊं बद्दल अजून माहिती कळेल ही अपेक्षा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मंतरलेली रात्र...!